पुरे झालं पाऊसपाणी

Published by

on

(कवी कुसुमाग्रज यांच्या प्रेम म्हणजे या कवितेचा विडंबन प्रयत्न)

पुरे झालं पाऊसपाणी, पुरे झाला वारा
भरून वाहिले नदीनाले, भरून वाहिला झरा
शहाण्यासारखा ढगाआड लपून रहा
नेहमीसारखा पृथ्वीला आकाशातून पहा
याच अंतरात सामावलंय जीवनचक्र याचा विश्वास दे तिला
 
पाऊसवेडी माणसं आणिक प्रेमयाचना करतील काय?
चिखला राडा रोडा सोडून तुझी आठवण तरी ठेवतील काय?
कानात वारं गेल्या गुरासारखा बरसत राहशील सतत
जास्तीत जास्त सहा महिने माणसं बसतील बघत
नंतर तुझ्यावरही उपाय शोधायला ती मागं-पुढं पाहतील काय?
म्हणून म्हणते, जागा हो, जाण्यापूर्वी वेळ
पाणी नाही काही असा येरागबाळ्याचा खेळ
      पाणी म्हणजे थेंबे थेंबे समुद्र होऊन जाणं
      पाणी म्हणजे जीविताचा आधार होऊन राहणं
 
उपकार कर राजासारखे मागितल्यानंतर केलेले
मातीमध्ये उगवून दाणे कितीक जीव वाचलेले
      वारावादळाच्या सामर्थ्यापुढे असा मान तुकवू नकोस
      रोजच्या रोज सूर्यासमोर पडदा धरू नकोस
 
जपून ठेव बाष्प सगळं काळजामध्ये साचलेलं
पुन्हा ये पुढल्या वर्षी घेऊन आभाळ ओथंबलेलं…